कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग ५ (ड) कार्यालयाच्या वतीने आज दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या व टपऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. हनुमान नगर, पावशे नगर, क्रिश बार परिसर, कैलास नगर, खडेगोळीवली तसेच काटेमानिवली रोड ते पाण्याच्या टाकीपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान एकूण ३२ हातगाड्या, १७ टपऱ्या आणि ९ लोखंडी स्टॉल हटविण्यात आले. जेसीबीच्या साह्याने ही तोडक कारवाई करण्यात आली असून संपूर्ण कारवाई प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
महापालिकेच्या पथकासोबत स्थानिक पोलीस प्रशासन तसेच ड प्रभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. फेरीवाला हटाव मोहिमेअंतर्गत रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सदर भागात नागरिकांना चालण्यासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत व्यवसायांवर लक्ष केंद्रित करून ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अशा प्रकारच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
महापालिकेच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पदपथ व रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.