विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर देखील यशस्वीपणे स्थापित
विंच पुलिंग पद्धतीने विनाखांब गर्डर उभारण्याचा अभियांत्रिकी आविष्कार
खासदार मनोज कोटक यांनी केली पाहणी
●ग्लोबल चक्र न्यूज
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग हद्दीत, पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी तब्बल १,१०० मेट्रिक टन वजनाचा, सुमारे १०० मीटर लांबीचा दुसरा गर्डर यशस्वीपणे स्थापन करण्याचा महत्वाचा टप्पा पार पडला आहे. त्यामुळे आता रेल्वे हद्दीतील पुलाचा विचार करता त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या अभियांत्रिकी चमूने हा आव्हानात्मक टप्पा पार पाडला.
सदर गर्डरची कामे रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिल्या होत्या. त्याची योग्य अंमलबजावणी पूल विभागाने करून दाखवली आहे.
दुसरा गर्डर स्थापन करतेवेळी स्थानिक खासदार श्री. मनोज कोटक, स्थानिक आमदार श्री. पराग शहा, सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण) श्री. विजय बालमवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) तथा संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) श्री. संजय कौंडण्यपुरे, उपप्रमुख अभियंता (पूल) (पूर्व उपनगरे) श्री. विवेक कल्याणकर त्याचप्रमाणे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता (ओव्हरहेड स्ट्रक्चर) श्री. प्रदीप कुमार गुप्ता, सहायक विभागीय अभियंता श्री. ए. एस. शास्त्री आणि इतर संबंधित अधिकारी तसेच श्री. प्रवीण छेडा, श्री. भालचंद्र शिरसाट आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार श्री. मनोज कोटक म्हणाले की, या पुलाच्या निर्मितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी अतिशय मन लावून काम केले आहे. पहिला गर्डर स्थापन होवून अवघ्या काही महिन्यातच दुसर्या गर्डर स्थापनेचे काम पूर्ण करणे शक्य झाले. येत्या काही दिवसांत या पूलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोच मार्गांची कामे पूर्ण होतील. त्यामुळे ईशान्य मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना वाहतुकीसाठी आणखी एक पर्याय खुला होईल, असे श्री. कोटक यांनी नमूद केले.
एन विभाग हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामकृष्ण चेंबूरकर आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानक रुळांच्या वरून जाणारा उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या निर्मितीमध्ये रेल्वे रुळांवरून जाणारा सुमारे १०० मीटर अंतराचा मुख्य पूल समाविष्ट आहे.
हा पूल बांधताना दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी एक असे दोन स्टील गर्डर स्थापन करावे लागणार होते. त्यापैकी पहिला गर्डर दिनांक २७ मे २०२३ रोजी यशस्वीपणे स्थापन करण्यात आला होता. तर दुसऱ्या गर्डरचे काम काल (दिनांक ४ नोव्हेंबर २०२३) मध्य रात्रीनंतर २ वाजता ते आज (दिनांक ५ नोव्हेंबर २०२३) पहाटे ५.३० वाजता या कालावधीत पूर्ण करण्यात आले.
दुसरा गर्डर बसवण्यासाठीच्या कामासाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक मंजूर केला होता. त्या वेळेत गर्डर स्थापन करण्याचे काम विंच पुलिंग पद्धतीने (winch pulling method) पूर्ण करण्यात आले. ओपन वेब पद्धतीचा हा गर्डर उभारणीसाठी रेल्वेमार्गावर एकूण ९९.३४० मीटर पुढे नेणे आवश्यक होते. पैकी रेल्वे रुळ ओलांडून सुमारे ७८ मीटर लांब पुढे पर्यंत गर्डर नेण्याचा महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. तर, उर्वरित २२ मीटर पुढे नेण्याचे काम येत्या दोन दिवसात पूर्ण केले जाईल.
या गर्डरचे वैशिष्ट्य म्हणजे ते भारतातील रेल्वेवरील आतापर्यंतचे सर्वाधिक असे प्रत्येकी ९९.३४ मीटर लांब व ९.५० मीटर रुंद असे हे दोन्ही गर्डर आहेत. त्यांचे वजन प्रत्येकी सुमारे अकराशे मेट्रिक टन आहे. या दोन खुल्या स्टील गर्डरची रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने उभारणी करण्याची प्रक्रिया महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून पार पाडण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या गर्डरला रेल्वे रुळांच्या मधोमध आधार न ठेवता, विनाखांब एकसंघपणे त्याची उभारणी केली जात आहे. हा अभियांत्रिकी क्षेत्रातला एकप्रकारे आविष्कार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी आजवर वेगवेगळे आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून दाखवले आहेत. सदर गर्डरच्या स्थापनेतील दोन्ही टप्पे यशस्वीपणे गाठणे हादेखील महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी यशस्वी कामगिरीतील मानाचा तुरा ठरला आहे.
सदर प्रकल्पाचे कंत्राटदार मेसर्स एबी इन्फ्राबिल्ड लिमिटेड हे आहेत. गर्डर स्थापन करण्यासाठी त्यांच्या वतीने १२ अभियंता, १ सुरक्षा अधिकारी, ३ पर्यवेक्षक, २ फोरमन, २ विंच ॲापरेटर, ३ सर्वेअर, २ वीजतंत्री आणि ७० कुशल कर्मचारी अखंड कार्यरत होते.
गर्डर स्थापन करण्याचे पूर्ण काम रेल्वे मार्गावर होणार असल्याने रेल्वे मंत्रालय अंतर्गत शासकीय उपक्रम असलेले मे. राईटस् लि. हे तांत्रिक पर्यवेक्षण सल्लागार म्हणून उपस्थित होते. यामध्ये ३ तांत्रिक व्यवस्थापक, ६ तंत्रज्ञ आणि १ पूल विशेषज्ञ सहभागी झाले होते.
दोन्ही गर्डर स्थापनेनंतर आता पुढील टप्प्यामध्ये पुलाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंकडील १७.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यांचे (approach roads) बांधकाम करण्यात येईल. येत्या पंधरवड्यात त्याचे देखील कार्यादेश दिले जातील. एकूणच, प्रकल्पाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे.
*विद्याविहार रेल्वे स्थानक येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाबाबत संक्षिप्त माहिती*
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग हद्दीत, पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या पूल विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आहे.
लालबहादूर शास्त्री मार्ग व रामकृष्ण चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६३० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३१० मीटर पोहोच मार्ग (approach road) बांधण्यात येत आहे.
रेल्वे रुळांच्या वर असलेल्या पुलाची रुंदी २४.३० मीटर राहणार आहे. यात दोन्ही बाजूला प्रत्येकी २ मीटरचे पदपथ देखील समाविष्ट आहेत. तर पोहोच मार्ग हा एकूण १७.५० मीटर रुंदीचा असेल. त्यात प्रत्येकी १ मीटरचा पदपथ दोन्ही बाजूस समाविष्ट असेल.
सदर उड्डाणपूल प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे १७८ कोटी रुपये आहे. पैकी, रेल्वे रुळावरील मुख्य उड्डाणपुलाचा खर्च सुमारे १०० कोटी रुपये तर पोहोच मार्ग आणि इतर कामे मिळून ७८ कोटी रुपये इतका खर्च आहे.
दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांची देखील पुनर्बांधणी या प्रकल्प अंतर्गत केली आहे. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा मार्ग (service road) देखील समाविष्ट आहे. सेवा मार्गाच्या कामाचा भाग म्हणून पूर्व बाजूस सोमय्या नाला पुनर्बांधणी देखील करण्यात आली आहे.
उड्डाणपूल निर्मितीतील आव्हानांवर देखील यशस्वी मात:
■ या पुलाचा आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता. सन २०२२ मध्ये बांधून हा पूल तयार होणार होता. मात्र रेल्वे मंत्रालयाच्या संशोधन, डिझाइन आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) पुलाच्या डिझाईन मध्ये बदल सुचवले. यामुळे रेल्वे हद्दीतील आराखड्यात बदल करावा लागला. त्याच बरोबर पुलाच्या पूर्व आणि पश्चिम भागातही बदल करावे लागले.
■ दिनांक २ मे २०१८ रोजी पुलाच्या बांधकामाचा कार्यादेश देण्यात आला. मात्र, मध्यंतरी कोविड संसर्ग कालावधीतील निर्बंधांमुळे प्रकल्पाच्या निर्मितीत अडथळे आले.
■ त्याचप्रमाणे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम करीत असताना देखील अनेक आव्हाने समोर आली. पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण, रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या तिकीट खिडकी कक्षांचे स्थानांतरण, प्रकल्पाच्या रेषेत आलेली अतिक्रमणे निष्कासित करणे, यांचा त्यात समावेश होता.
■ यासोबत, कामांच्या गरजेनुसार रेल्वे प्रशासनाची समन्वय साधून रेल्वे ब्लॉक घेणे, हेदेखील आव्हानात्मक ठरले आहे. ही सगळी आव्हाने पार करत हा प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वाकडे सरकतो आहे.